२०१३/०२/२४

खारीचा वाटा

आज फेसबुक वर एक व्हिडिओ क्लिप पाहायला मिळाली. सुनिता कृष्णन्  नावाची एक अगदी आपल्यासारखी मुलगी 'human traffic' विरुद्ध विशेषतः लैंगिक अत्याचाराविरुद्ध काम करत आहे. त्यांनी सांगितले, की लहान वयात त्या स्वतः सामुहिक बलात्काराच्या बळी ठरल्या असून त्या घटनेने त्यांच्यात जी चीड निर्माण केली त्यापासून प्रेरणा घेऊन अगदी लहान वयात (१५/१६  व्या वर्षी) त्यांनी ह्या कामाला सुरुवात केली. आपल्या बोलण्याच्या सुरुवातीला त्यांनी  ४ - ५ वर्षांच्या छोट्या ३ मुलींची कहाणी सांगितली ज्या त्यांच्या आई-वडिलांकडूनच अशा अत्याचारासाठी विकल्या गेल्या आणि काही काळातच त्या HIV positive होऊन मरण पावल्या. सुनिता यांनी आजपर्यंत ३००० हून अधिक मुली व स्त्रियांना या विळख्यातून सोडवले आहे आणि पुरुषी वर्चस्व असलेल्या व्यवसायात (जसे वेल्डर , सुतार, इलेक्ट्रीशियन) त्यांना प्रशिक्षण देऊन स्वतः च्या पायावर उभे केले आहे. हेच व्यवसाय निवडण्यामागचे कारणही  सुनिता यांनी सांगितले, की त्या मुली आता देह -लाजेचा पडदा दूर करून पुढे आल्या आहेत. इतके अत्याचार त्यांनी सहन केले आहेत, की आता भोवताली अनेक पुरुष  वावरत असताना स्त्रीला सामान्यतः जो संकोच वाटतो, जी लाज वाटते त्या पलीकडे त्या मुली पोहोचल्या आहेत. आणि अगदी सहज पणे अशा व्यवसायात त्या आपला जम बसवू पाहत आहेत.


त्या नंतर त्यांनी एक प्रसंग सांगितला -- त्यांच्या एका हितचिंतकाच्या घरी कामासाठी एका मुलीची गरज असताना, त्यांनी सुनिता यांना अशी एखादी मुलगी कामासाठी मिळेल का ते पाहायला सांगितले, पण त्याच बरोबर ती मुलगी 'आपल्या कामाच्या परिवारातील नको' असे सांगण्यास तो हितचिंतक विसरला नाही. का बरे? सुनिता यांच्या म्हणण्याप्रमाणे सुशिक्षित आणि स्वतःला सुधारकी /सुधारित , पुरोगामी म्हणवणारा समाजच हे त्यांच्या पुढील मोठे आव्हान आहे. ह्या समाजासाठी त्यांनी 'culture  of  silence' - मूग गिळून गप्प बसण्याची संस्कृती असा शब्द प्रयोग वापरला आहे. जेव्हा अशा पिडीत व्यक्ती संबंधी प्रश्न उभे राहतात, त्यांच्या पुनर्वसनासाठी पुढे येण्याची गरज वाटते, त्यांना आपल्यातील एक म्हणून स्वीकारण्याची गरज उभी राहते, तेव्हा  एरव्ही संमेलने, सभा भरवून अश्या विषयांवर चर्चा करणारे लोक पुढे येत नाहीत, किंबहुना अशा चर्चा , सभा इथपतच अशा पुरोगामी समाजाचे काम मर्यादीत राहते. (ह्या संदर्भात आपल्या कडे दिल्लीत घडलेली घटना आणि त्या नंतर झालेला प्रक्षोभ हे उदाहरण आठवले. अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याकरिता आणि योग्य अशा कायद्यांची मागणी करण्याकरिता अशा प्रकारची घटना घडणे आणि एका मुलीचे आयुष्य संपण्याची का गरज आहे??)


सुनिता यांनी आपल्या बोलण्यात लोकांना आवाहन केले आहे, की अगदी घर-दार सोडून अशा कामात झोकून  द्यायची प्रत्येकाला गरज नाही, पण प्रत्येकाने आपल्या आखून घेतलेल्या चौकटीत राहून, मौन सोडून जर अशा गोष्टी आणखी चार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निश्चय  केला आणि त्याद्वारे जरी समाजात अशा व्यक्तींना स्वीकारण्याचे  सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकले तरी खूप मदत होईल. अशा प्रकारच्या कामात किमान ह्या कार्याचा प्रसार करून खारीचा वाटा आपण नक्कीच उचलू शकतो, नाही का?
https://www.facebook.com/photo.php?v=252570828098848&set=vb.232530536780583&type=2&theater
ही पोस्ट वाचणा-या मित्र मैत्रिणींनी ही लिंक कृपया शेअर करावी अशी नम्र विनंती !

1 टिप्पणी:

Shriraj म्हणाले...

Thanks for sharing this story, Devashree